चाळीसगाव शहरात आंबेडकरवादी संघटनांकडून निषेध मोर्चा काढण्यात आला
सरन्यायाधीशांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आंबेडकरवादी संघटनांचा निषेध मोर्चा

चाळीसगाव – (प्रतिनिधी, रणधीर जाधव):-
सरन्यायाधीश भुषण गवई यांच्यावर झालेल्या हल्याच्या निषेधार्थ चाळीसगाव येथे मोर्चा काढण्यात आला, आंबेडकरी संघटना, वकील संघ, आंबेडकर प्रेमी, संविधान प्रेमीच्या वतीने निषेध करत दोषींवर UAPA कायद्यानुसार कारवाई व्हावी अशी मागणी करण्यात आली दि.15 रोजी सकाळी काढण्यात आलेल्या या मोर्चात हजारोच्या संख्येने नागरिक उवस्थित होते, यावेळी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री यांच्याकडे तहसीलदार प्रशांत पाटील यांना निवेदन देण्यात आले. डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक येथून सकाळी 11 वाजता मोर्चाची सुरुवात करण्यात आली मोर्चाने चाळीसगाव वासियांचे लक्ष वेधले होते. निवेदनात म्हटले आहे की देशाचे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भुषण गवई यांच्यावर दि.6 ऑक्टोबर रोजी जातीवादी व मनुवादी विचारसरणीचा वकील राकेश किशोर याने केलेला हल्ला हा अत्यंत गंभीर, निंदनीय आणि राष्ट्राच्या लोकशाही मूल्यांवर झालेला थेट आघात असून न्यायव्यवस्था ही भारतीय संविधानाची आत्मा असून तिच्या प्रमुख व्यक्तीवर हल्ला करणे म्हणजे संविधान, लोकशाही व राष्ट्राच्या सुरक्षिततेवर प्रहार आहे. या कृत्यामुळे समाजात कायद्याविषयी भीती नाहीशी होण्याचा धोका निर्माण झाला आहे. न्यायालयीन व्यवस्थेवरील हल्ला हा देशद्रोहाच्या समान गुन्हा असून, तो केवळ व्यक्तीविरुद्ध नव्हे तर भारताच्या संविधानविरुद्ध आहे. म्हणून दोषीवर “UAPA (Unlawful Activities Prevention Act)” अंतर्गत कठोर गुन्हा नोंदवून कठोर शिक्षा करण्यात यावी मागणी करण्यात आली आहे. यावेळी आंबेडकरी समाज, आंबेडकर प्रेमी, संविधान प्रेमी, वकील बांधव, बहुजन समाजातील नेते, कार्यकर्ते व आंबेडकरी चळवळीतील नेते, कार्यकर्ते, समाजबांधव, महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.